Sunday 16 April 2017

विरुद्धान्न आणि आयुर्वेद

दोन आहारघटकांना एकत्र केल्यास, त्यांचा संयोग जर पचनानंतर शरीरास अहितकारक ठरत असेल तर त्या आहारसंयोगास विरुद्धान्न असे म्हणतात. तर या भागात,विरुद्धान्न कोणते? त्याने शरीरास काय अपाय होतो? याचे सविस्तर वर्णन बघुयात.

आजकाल न्याहारीच्या (Breakfast) वेळी दुधासोबत किंवा चहासोबत फरसाण, खारी, बिस्किटे, ब्रेड, पाव, इ. पदार्थ सर्रास खाल्ले जातात. दुध हे मधुर रसाचे आहे व वरील जवळजवळ सर्व पदार्थांमध्ये मीठ असतं. आयुर्वेदानुसार दुध व मीठ एकत्र खाऊ नये कारण ते विरुद्ध अन्न आहे. अशावेळी दूध जे शरीरासाठी अतिशय हितकारक पदार्थ आहे, मीठासोबत संयोग केल्याने शरीरास उपयोगी न होता अपायकारक होतो. असा महत्वाचा आहारघटक इतर पदार्थांशी मिश्रण करताना काळजी घेणे जरुरीचे आहे व हीच संकल्पना विरुद्ध-अन्नात सांगितली आहे.



विरुद्ध अन्नसेवनाचे काही दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे बघुयात -

१) दही गरम करणे
हॉटेल्स मध्ये किंवा काही घरांमध्ये देखील चिकन किंवा मटणास दही,आले,लसूण लावून ( Marinate ) मग शिजवले जाते. व्हेजिटेबल बिर्याणी मध्ये देखील शिजताना दही घातले जाते.

२) दुध + केळी
व्यवहारात दुधात केळी घालून त्याच शिकरण बरेचदा खाताना बघतो. पण हे देखील विरुद्ध अन्न आहे. यामुळे जठराग्नी मंद होऊन पचनक्रिया बिघडते, त्यामुळे आम तयार होऊन सर्दी, पडसे, खोकला, त्वचाविकार इ उत्पन्न होतात.

३) दुध + आंबट फळे
दुधाचा अम्ल रसासोबत संयोग आयुर्वेदाने निषिद्ध मानला आहे. दुधात अम्ल रस मिसळल्यास ते विरजते व आमाची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरते. म्हणून आयुर्वेदाने स्ट्राबेरी, अननस. संत्री, इ सह दुधाचे सेवन( मिल्कशेक्स व फ्रुटसॅलड्स ) विरुद्धान्न  सांगितले आहे.

४) दुध + मासे
दुध हे शीत गुणाचे तर मासे हे उष्ण गुणाचे असतात त्यामुळे ते एकत्रित खाल्ल्यास विरुद्धान्न ठरते.

५) मध गरम करणे / गरम द्रव्यांसोबत घेणे
मधास गरम केल्यास त्याचं चिकट पदार्थात रूपांतर होऊन ते शरीरातील विविध पोकळ्यांमध्ये (स्रोतसे ) जाऊन तिथे चिकटून हळूहळू अवरोध उत्पन्न करते. यामुळे आम या विषारी द्रव्याची निर्मिती होऊन कालांतराने विविध आजारांमध्ये त्याचे रूपांतरण होते.
मग ते मध गरम चहात टाकून पिणे असो किंवा कोणताही पदार्थ ज्यात मधास तापवले गेलेले असो ते विरुद्धान्नच ठरते.

ही काही दैनंदिन व्यवहारात नजरेस पडणारी विरुद्धान्न सेवनाची उदाहरणे आहेत.

अशाप्रकारे विरुद्धान्न सेवन नियमित खूप काळ सेवन केल्यावर आपली पचनशक्ती दुबळी होऊन अग्निमांद्य होऊन जे हि खाऊ ते नीट न पचता त्या अर्धवट पचलेल्या आहाररसापासून आम तयार होऊन हळूहळू शरीर आजारी होऊन व्याधी निर्मिती होते व शरीर पोखरले जाते. ज्या व्यक्तींचा जठराग्नी तीव्र आहे जे नियमित व्यायाम करतात, त्या व्यक्तीच्या शरीरावर विरुद्धान्न सेवनाचा परिणाम कमी मात्रेत होतो. पण त्यांनी देखील जर निरंतर विरुद्धान्न सेवन केले तर उशिरा का होईना पण आजार येतील एवढं नक्की.

No comments:

Post a Comment